बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Tuesday 18 October 2011

आप्त


[माझ्यमते ही कथा आहे, वाचकांना ते ललित वाटु शकते स्मित ]

घशाला पडलेली कोरड जाणवतच मला जाग आली आणि हिवाळा पुर्णपणे संपल्याचे जाणवले. उठुन ग्लासभर थंड पाणी प्यावे असे वाटले खरे पण तसे न करता सरळ वॉश बेसिन कडे गेले. ब्रश तोंडात सरकवला आणि सवईनेच पेपर शोधायला निघाले. अचानकच माझे त्यांच्याकडे लक्ष गेले. त्यांना पण पाणी हवे आहे असे मला वाटले.

गेल्या काही दिवसांपासुन चांगलेच उन पडायला लागले होते. सकाळी ऑफीस ला जाताना सुध्दा जाणवत होते. जरी बाहेर पडत नव्हते तरी तापमानातला हा बदल त्यांनाही जाणवला असणे स्वाभाविक होते. पण ते काही सकाळी - सकाळी पाणी मागणार नाहीत आणि दिलेले पाणी कमी पडले म्हणून तक्रार सुध्दा नक्कीच करणार नाहीत. हे जाणवले खरे पण ताबडतोब उठुन त्यांना पाणी द्यावे असे काही वाटले नाही. थोडेसे दुर्लक्ष करुन मी तशीच वर्तमानपत्र चाळत सोफ्यात रेलले.

तसेही आजकाल मला त्यांच्याकडे फारसे लक्ष देणे होतच नसे. खास त्यांच्यासाठी काही करण्याचा कंटाळा येई. त्यांना इथे, या घरी, हौसेने आणि मी माझ्या इच्छेनेच आणले होते. पण आता ती हौस काही उरली नव्हती, किंवा संपली होती. त्याचाच पुरावा म्हणजे 'मागच्या आठवडाभरात आपण त्यांच्याकडे फिरकलेलोही नाही' याची जाणीव झाली. 'ऑफिस मधे काम वाढल्याने रिकामा वेळच मिळत नाही, माझा पण नाईलाज आहे' अशी स्वताचीच समजुन करुन घेत मनावरचा ताण थोडा सैल केला. आणि पुढच्या कामाला लागले खरी पण डोळ्यासमोरुन जुन्या आठवणी सरकु लागल्या.

माझ्या वडिलांपासुन त्यांचा आमच्या घराशी ऋणानुबंध. आम्ही लहानाचे मोठे झालो ते यांच्या सहवासात च. त्यामुळे त्यांचे असणे फारसे वेगळे असे कधी जाणवलेच नाही. माझ्या वडिलांचे त्यांच्याशी अत्यंत प्रेमाचे नाते होते, त्यांच्याबद्दल आपुलकी होती, माया होती. त्यांचे सगळं ते अगदी निगुतीने करत. कामाच्य व्यस्ततेमुळे कित्येकदा त्यांच्यासाठी वेळ काढणे माझ्यावडिलांना शक्य होत नसे. पण आम्हा भावंडांना मात्र सक्त ताकीद असे. त्यांच हव-नको बघणे, त्यांची स्वच्छ्ता सांभाळणे. आम्ही भावंडही वडिलांची आज्ञा म्हणुन करत असु. पण पुढे-पुढे मला त्यांचा लळा लागला. जशी-जशी मोठी होत गेले, तसे तसे ते मला अधिक समजु लागले, आवडु लागले. त्यांच्याबरोबर वेळ घालवणे हा मला एक छंदच जडला. दिवसभरातला थोडा तरी वेळ मी त्यांच्या सहवासात घालवत असे.

पुढे नोकरीच्या निमीत्ताने पुण्यात आले. मी स्वताच दुसर्‍यांच्या घरी रहात असल्याने 'ते' माझ्याबरोबर असण्याचा प्रश्णच नव्हता. पण स्वत:च्या हक्काच्या घरात रहायला आल्याबरोबर मी आंनदाने आणि उत्साहाने त्यांना घरी घेउन आले. आणि लहानपणी करत असे अगदी तशीच त्यांची सेवा करु लागले.
पुर्वी प्रमाणेच दिवसातला थोडा तरी वेळ त्यांच्या सहवासात घालवु लागले. पहिले वर्ष अगदी आनंदात गेले. पुढे मी नोकरी बदलली, कामाचा पसारा वाढु लागला आणि त्यांचे हवे-नको 'रोजच' बघणे मला जमेनासे झाले. पण तरीही वेळात वेळ काढुन मी त्यांची काळजी घेत होते.

पुढे उन्हाळा आला. तो मात्र खुपच त्रासदायक गेला. ते अगदिच केविलवाणे दिसू लागले. जरी मला काळजी वाटत होती तरी फार काही मी करु शकत नव्हते कारण तापमानच विक्रमी होते. आणि त्यांना ते सहन होत नव्हते. उन्हाळा त्यांना जास्तित जास्त सुसह्य होईल असे प्रयत्न माझ्या परीने मी करत होते. पण शेवटी उन्हाळा संपुन आभाळ भरुन आले आणि पावसाच्या सरी यायला लागल्या तेंव्हाच त्यांची तगमग हळु-हळु कमी झाली. माझी काळजी मिटली आणि मी माझ्या कामात बुडाले.

दिवाळीत जोडुन सुट्टी होती म्हणुन चार दिवस 'कान्हा' ला जायचा बेत केला. त्यांना एकटे ठेउन जावे लागणार होते पण दुसरा काही मार्ग ही दिसत नव्हता. त्यांचे हवे-नको बघुन निघाले खरी, पण मनात थोडी रुख्-रुख घेउनच.

एक नवाच अनुभव मनात साठवुन, संपुर्ण ताजेतवाने होउन घरी परत आले तेंव्हा खुप आनंदात होते. सामानाची थोडी आवरा-आवर करुन त्यांच्याकडे डोकावले. आणि त्यांची अवस्था बघुन तशीच मागे वळाले. निस्तेज झालेले त्यांचे रुप अगदी बघवत नव्हते. ते अगदिच गळुन गेले होते. कितीही वाईट वाटले तरी त्यांची काळजी घेणे भाग होते. थोडी अधिकच घ्यावी लागणार होती. थोडे दिवस मी तसे केलेही. त्यांच्यात थोडासा फरक दिसु लागला, पण पुर्वीसारखे नाही. आता त्यांना 'अशा' अवस्थेत बघण्याची माझ्या नजरेलाही सवय झाली. फारसे वाईटही वाटेनासे झाले.

त्यानंतरच हळुहळु त्यांच्यासाठी काहिही करणे मला कंटाळवाणे वाटु लागले. तसा मी रोजचा व्यवहार सांभाळत होते. पण पुर्वीसारखे प्रेमाने नाही तर कर्तव्य म्हणुन. कदाचित हा बदल त्यांनाही जाणवला असेल आणि म्हणुनही त्यांच्यात फारशी सुधारणा होत नसेल. या विचाराबरोबर परत एकदा अपराधी पणाची जाणिव मनात भरुन गेली. आणि ........
अर्धि लाटलेली पोळी तशिच टाकुन मी बाथरुम कडे धाव घेतली. धो-धो नळ सोडुन मिनीटात बादली भरली आणि गॅलरीत पोहोचले. बघते तर काय - लिलीला कळी आलेली, गुलाबाला फुल, सिताफळाला पालवी आणि मोसंबी तर फुटभर उंच झालेली.

क्षणभर त्यांच्याकडे, माझ्या झाडांकडे, बघताना मला एखाद्या तवस्वी, निर्लेप मनाच्या सेवाभावी महात्म्याचा भास झाला. मी त्यांच्यावर नखशिखांत पाण्याचा वर्षाव केला आणि तहानलेल्या माझ्या झाडांनी त्यांचा आनंद मातीच्या सुगंधाबरोबर माझ्यापर्यंत पोहोचवला, माझ्यावर अजिबात न रागवता !!

- आरती

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.