बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Thursday 14 July 2016

'सखी'


१९९५ ते २०१५, मोजलं म्हणून लक्षात आल की पूर्ण २० वर्ष झाली आहेत आमची ओळख आणि त्याच्या अगदी पाठोपाठ मैत्री होऊन. मी काम करत असलेल्या विभागात सगळे 'बाप्ये' होते आणि अचानक एक दिवस ही आली. माझ्या त्यावेळच्या स्वभावाला अनुसरून तिच्याकडे बघून मी जरासं हसले आणि माझ्या जागेवर जाऊन बसले. ती मात्र तोंडभरून हसली आणि लगेचच उठून मी बसले होते तिथे आली. त्या सगळ्या बाप्यांमध्ये कंटाळलेल्या मला मैत्रिण मिळाली म्हणून मी कितीही खुश झाले असले तरी असं ताबडतोब जाऊन गप्पा मारण मला जमणारं नव्हत.

सकाळी आल्यावर ती रोजच माझ्याशी २-४ वाक्य बोलायची आणि जेवताना ग्रुपमध्ये थोड्या गप्पा व्हायच्या. मग झालं अस की आमचे दोघींचे साहेब एकच असल्याने अचानकच आम्हाला एकत्रितपणे एका प्रोजेक्टची जबाबदारी देण्यात आली. दोघींचे कामाचे स्वरूप पूर्ण वेगळे होते, पण संपूर्णपणे एकमेकांवर अवलंबून होते. ती मोठ्याने हसायची, मोठ्याने बोलायची. मला हळूच हसा-बोलायची सवय होती. मला वैयक्तिक काहीच बोलायचं नसायचं आणि ती एकदम मोकळ्या गप्पा मारायची. असे आमचे बरेच विरुद्ध स्वभाव असले तरी मला काय म्हणायचंय ते तीला आणि तिला काय म्हणायचंय ते मला, नीटच कळत होत. त्यामुळे अगदी नवख्या असूनही आमच ते प्रोजेक्ट एकदम टकाटक झाल. आणि त्याच दरम्यान कधीतरी आमची घट्ट मैत्री पण झाली.

गप्पा मारायला मिळाव्या म्हणून आम्ही पौडफाट्याहून चालत निघायचो ते थेट कोर्पोरेशन पर्यंत. तिथे ती सांगवीच्या बसमध्ये बसायची आणि मी पौडरोडची बस घेऊन परत उलट यायचे. इतकावेळ गप्पा मारून पुन्हा बसस्टॉपवर थांबून पण गप्पा असायच्याच. कधीतरी निघाल्या निघाल्या 'सुरभी' मध्ये पावभाजी खायचो पण जास्तवेळा थेट गंधर्वला पोहोचून 'वडा-सांबार आणि चहा' घ्यायचा, असे आम्ही जवळ जवळ रोज करायचो. विरुद्ध स्वभावाच्या आमच्या दोघींच्या आवडी-निवडी मात्र बऱ्याच एकसारख्या होत्या त्यामुळे गप्पांना अंत नसायचा.

मग मी ती नोकरी सोडली आणि पुण सोडलं. नंतर तिचं लग्न झालं आणि पुण सुटलं. क्वचित होणाऱ्या भेटीगाठी बंदच पडल्या. त्यावेळी आमच्या आयुष्यात मोबाईल फोन आणि इंटरनेट दोन्ही आलेले नव्हते. त्यामुळे भेटीबरोबर गप्पाही थांबल्या.

नंतर ती आणि मी, दोघीही, परत पुण्यात आलो आणि क्वचित कधीतरी भेटू पण लागलो. पण आयुष्य इतकी बदलली होती आणि व्यस्त झाली होती की बोलायला सुरुवात करेकरेपर्यत निघायची वेळ होत असे. माझ्यापेक्षाही तीचा वेळेचा प्रश्न जास्त होता. लहान मुल, नोकरीत वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि घरच्या जबाबदाऱ्या. आणि मग पुन्हा एकदा मी पुण सोडलं :)

आत्ता आज हे सगळ आठवायचं कारण म्हणजे, ३ आठवड्यांपूर्वी ऑफिसच्या कामाने ती माझ्या 'टाईम झोन' मध्ये आली होती. तीन आठवडे प्रत्येक दिवशी कधी संध्याकाळी कधी रात्री आणि सुट्टीच्या दिवशी दुपारी सुद्धा जेंव्हा जेंव्हा जमेल तेंव्हा तेंव्हा आम्ही एकमेकीना फोन केले आणि चिक्कार गप्पा मारल्या. ती एकटीच होती त्यामुळे ऑफिसमधून आली की तशी मोकळी असायची. मी रोजची जरुरी काम संपवून तयारच असायचे. पहिले २-३ दिवस तर अगदी मेडीटेशनला बसल्या बसल्या जशी विचारांची गर्दी होते तशी विषयांची गर्दी झाली. मग हळू हळू एक एक विषय हातावेगळे होत गेले. बरीच देवाण-घेवाण झाली. तास-दीड तास बोलून मग 'जाउदेना आपल्याला काय करायचंय' असा तो एक 'खास' फोन पण झाला. एकूण मनसोक्त गप्पा झाल्या. खळखळून हसून झालं.

'त' म्हंटल्यावर 'ताकभात' की 'तूपभात' हे अचूक ओळखणारी आणि बोलणाऱ्याच्या बोलण्यामागाची प्रामाणिक भावना जाणणारी व्यक्ती समोर असेल तर गप्पांना जी मजा येते ती काही वेगळीच असते.
'आता आपण आठवड्यातून एकदातरी बोलतच जाऊ' असा तो नेहमीचा निरोप घेऊन ती काल परत पुण्याला गेली. मला पक्की खात्री आहे आता किमान काही महिने तरी आम्ही एकमेकींना फोन नक्कीच करणार नाही पण जेंव्हा करू तेंव्हा अगदी सहजच  दोघी मिळून मागच्या पानावरून पुढच्यावर डोकावू .......

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.