बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकाच हेतू

बोलण्या-लिहिण्यामागे माझ्या मते एकच हेतू - आपल्याला काहीतरी उत्कटतेने वाटत असते, ते इतरांना सांगावे.

.
.

Wednesday 13 July 2016

काव्यदिंडीच्या निमित्ताने .....


खरतरं गेली काही वर्ष कवितांच वाचन खूपच कमी झाल आहे. कारण जुनी पुस्तकं जवळ नाहीत आणि नवी घेतली गेली नाहीत. पण या काव्यदिंडीच्या निमित्ताने गेल्या काही दिवसात कितीतरी नव्या, विस्मृतीत गेलेल्या, बऱ्याच कविता वाचनात आल्या. पण आता चार निवडायची वेळ आली तेंव्हा मात्र पुन्हा काहीच आठवेना. 

.नवीनच पुण्यात आले होते. 'डीएसके गप्पा' नावाच्या कार्यक्रमात ना.धो.महानोर काव्यवाचन करणार होते. त्या आधी मी महानोरांच्या बऱ्याच कविता वाचल्या होत्या, त्यांनी लिहिलेली गाणी ऐकली होती. पण दोन अडीच तासांच्या त्या कार्यक्रमात महानोरांची कविता एका वेगळ्याच रुपात समोर आली. महानोरांची कविता समजत नाही असे सहसा होत नाही. पण खरी भिडली ती त्यादिवशी. सहज - साधी - ओघवती शैली. कुठलाही अभिनिवेश नाही की 'स्टाईल' चा खटाटोप नाही. कविता, तिची निर्मिती प्रक्रिया, तिच्या जन्माची कहाणी आणि बरेच काही. कवितेतून श्रोत्यांशी साधलेला संवादच होता तो. त्या दिवसापासून महानोरांची कविता वाचतानाची मानसिकताच एकदम बदलली. 

.महानोरांची बरीच गाणी आणि कविता आवडत्या आहेत परंतु ही कविता आजच्या परिस्थितीवर भाष्य करणारी आहे, म्हणून तिची निवड.

.पीक करपलं पक्षी दूरदेशी गेलं
गळणार्‍या झाडांसाठी मन ओथंबलं
वेढून नेणारी रित्या नभी वाहाटूळ
आसमंत वेटाळून काळजाची कळ
दु:ख पेलण्या एवढं बळ नाही डोलां
कडू काल्यावण्यांनी भारावला गला
कोवल्या गर्बाला जल्माआधी वनवास
वो मालवला दिसं, मालवला दिसं

- ना.धों. महानोर.

-------------------

मी बरीच वर्ष ठराविक कवींच्याच कविता वाचायचे. त्यामुळे बोरकर,मर्ढेकर,पद्मा गोळे यांच्या कविता मी कधी वाचल्याच नव्हत्या. पुण्यात यशवंतरावला बघितलेल्या सुनीताबाई देशपांडेंच्या 'एक कवितांजली' या कार्यक्रमात पहिल्यांदा माझी या कवींतांशी ओळख झाली. आणि मग सुनीताबाईंनी त्या कार्यक्रमात वाचलेल्या, नुसताच ओझरता उल्लेख केलेल्या आणि इतरही अजुन बऱ्याच कविता शोधून शोधून वाचल्या, वाचत राहिले. या सगळ्याजणींमध्ये लक्षात राहिली ती पद्मा गोळे यांची 'चाफ्याच्या झाडा'.

त्याचं कारणही तसंच आहे. काही कामासाठी मी सुनीताबाईंच्या घरी गेले होते. दोन मिनिटांचे काम होते पण दोन तासाहून अधिकवेळ मी तिथे होते. अर्थातच त्या बोलत होत्या आणि मी ऐकत होते. विषयातून विषय निघत, या कार्यक्रमाचा विषय निघाला आणि त्यांनी मला पद्मा गोळे यांची, त्यांना विशेष आवडणारी म्हणून ही कविता म्हणून दाखवली..
पुलंना जाऊन बरीच वर्ष झाली होती. त्याही बऱ्याच थकलेल्या दिसत होत्या. सगळीकडे एकटेपण भरून राहिलेलं ते घर तर अगदी सूनं सूनं वाटत होत. तिन्हीसांजेची वेळ होती आणि मी कविता ऐकत होते ............

चाफ्याच्या झाडा..
का बरे आलास आज स्वप्नात?
तेव्हाच तर आपले नव्हते का ठरले?
दु: ख नाही उरलं आता मनात
फुलांचा पांढरा, पानांचा हिरवा 
रंग तुझा रंगतोय माझ्या मनात
केसात राखडी पण पायात फुगडी
मी वेडी भाबडी तुझ्या मनात
चाफ्याच्या झाडा ….

नको ना रे पाणी डोळ्यात आणू
ओळख़ीच्या सुरात, ओळखीच्या तालात
हादग्याची गाणी नको म्हणू 
तुझ्या चाळ्यात एक पाय तळ्यात 
एक पाय मळ्यात खेळलोय ना
जसे काही घोड्यावर तुझ्याच फांद्यांवर 
बसूनआभाळात हिंडलोय ना

चाफ्याच्या झाडा …. चाफ्याच्या झाडा ….
पानात, मनात खुपतंय ना 
काहीतरी चुकतंय, कुठेतरी दुखतंय
तुलाही कळतंय …. कळतंय ना ….
चाफ्याच्या झाडा…. चाफ्याच्या झाडा
हसून सजवायचं ठरलय ना
कुठं नाही बोलायचं, मनातच ठेवायचं
फुलांनी ओंजळ भरलीये ना.

– पद्मा गोळे..
---------------------------

सकाळ पेपरमध्ये एक सदर येत होते. नाव अजिबातच आठवत नाहीये. पण त्याअंतर्गत 'नवंकवी' म्हणून कवी सौमित्र यांची थोडक्यात ओळख आणि काही निवडक कविता छापून आल्या होत्या. थोड्या वेगळ्याच वळणाच्या त्या कविता खूपच आवडल्या.

अर्थातच माझी आजची कविता 'माझिया मना' सगळ्यात जास्त आवडली. तेंव्हाच कधीतरी त्यांचा
काव्यसंग्रह 'आणि तरीही मी' येत असल्याचे वाचले. तो मात्र सांगितल्या तारखेच्या खूपच उशिरा आल्याने
मधल्या काळात मी अनेकवेळा अप्पा बळवंत चौकात त्याच्या चौकशी करता चक्कर टाकून येत असे. अखेर तो आला.पण आधीच्या चार कविता वाचून वाढलेल्या अपेक्षा काही त्याने पूर्ण केल्या नाहीत. खूप उस्तुकतेने वाट बघितल्यामुळे असेल, माझी खूपच निराशा झाली आणि नंतर मी या कवीचे फारसे काहीच वाचले नाही. परंतु ही कविता मात्र कायमच आवडत्या कवितांच्या यादीत राहिली.'ऋतू हिरवा' ऐकल्या नंतर तर थोडी अधिकच भावली.
.
माझिया मना, जरा थांब ना
पाऊली तुझ्या माझिया खुणा
माझिया मना, जरा बोल ना
एकटी न मी सोबतीस तू
माझिया मना, जरा ऐक ना
रात्र ही सुनी, तुझे बोलणे
तुझे धावणे अन मला वेदना
ओळखू कसे मी, हे तुझे ऋतू
ओळखू कशा मी तुझ्या भावना
सांजवेळ ही, तुझे चालणे
उषःकाल आहे नवी कल्पना

- सौमित्र (Kishor Kadam)
--------------------------------
NRI मायबोलीकर (www.maayboli.com) आले की त्यांना भेटायला पुण्यातले मायबोलीकर एकत्र जमायचे. अश्याच एका प्रसंगी माझ्यापासून ३ खुर्च्या लांब बसलेल्या वैभवने हात लांबवून त्याचा फोन मला दिला आणि 'हे ऐक' असे सांगितले. तोपर्यंत वैभवने मायबोलीवर टाकलेल्या सर्व कविता वाचत होते आणि त्या आवडतही होत्या. पण त्याची कविता त्याच्याच आवाजात त्यादिवशी मी पहिल्यांदाच ऐकत होते. आणि हा काही वेगळाच अनुभव होता. मला खात्री आहे अनेकवेळा त्याचे कार्यक्रम बघितलेले अनेकजण अगदी एकमताने हेच म्हणतील. :)

"वैभवच्या कविता" याबद्दल मी काही लिहिण्याची खरतरं आवश्यकताच नाही. कारण माझ्या मित्र यादीतल्या सर्व काविताप्रेमिनी त्या अनुभवलेल्या आहेत. इतकंच म्हणेन वैभवच्या कविता नेहमीच अगदी ताज्या आणि टवटवीत असतात.

असंख्य आवडत्या कवितांमधून एक निवडणे अवघडच होते पण ही अनेकवेळा त्याच्याकडून ऐकूनही पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटणारी म्हणून हिची निवड .... 

'नेमस्त'
धरतीवर उमटत गेल्या अलवार उन्हाच्या ओळी
तो शहारला नेमाने ही कविता सुचतेवेळी
नित्यागत उमलत गेली हळुवार कल्पना त्याची
सवयीचा सुगंध आला होताच फुले शब्दांची
नेमस्त हरखला तोही द्यावया ना उरले काही
नेमस्त चरकला फिरुनी ... "ही शेवटची तर नाही?"
रे छळू नका रे त्याला का नवे न काही स्फुरते
एखाद्या आयुष्याला एखादी कविता पुरते...

- वैभव जोशी.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.